वेड्याची अवस्था तर या दृष्टीने निश्चितच विचारांत घेण्यासारखी आहे. आपण वेडे आहोंत हें न कळणे, हे वेडाचे मोठेच लक्षण आहे. माणसाचे आत्म्याविषयीचे अज्ञान या वेडासारखेच आहे. ब्रह्म मायेने आवृत आहे. पुरुष प्रकृतीच्या पाशांत गुंतलेला आहे. चांगला बुद्धिमान् माणूसहि मूढ ठरतो तो यामुळेंच. तो मायेच्या प्रभावांतून दूर होऊं शकत नाहीं. प्रकृतीच्या अंगभूत अशा सत्त्व-रज- तमाचा पडदा त्याच्या ज्ञानशक्तीला कुंठित करतो. सत्यापेक्षा त्याच्या झाकणाचेच आकर्षण त्याला वाटते, जशी पुष्कळ तेले बाटलीचा सुंदर आकार आणि चित्रविचित्र रंगांचे सुरेख वेष्टण यामुळेंच अधिक खपतात. तेलांतले गुण विचारांत घेतले जातच नाहीत. मनुष्य आत्मज्ञानापासून दुरावतो तो हा असा.
COPYRIGHT © 2025 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित