जन्माला आलेले मूल वाढू लागतें. वीसपंचवीस वर्षांपर्यंत त्याच्या शरीरांत, हालचालींत, अवयवांच्या सामर्थ्यांत, क्रमानें परिवर्तन होत राहते, विकास होत राहतो. पंचविसाव्या वर्षी व्यक्तिमत्त्वाला सर्वदृष्टीनें पूर्णता येते, आणि शरीराच्या पातळीवर तरी पुढें १०-१२, वर्षें तें नैसर्गिकपणे जसेच्या तसें टिकून राहते. पुढें नकळत उतार लागतो. पन्नाशीनंतर तें थोडे जाणवू लागतें, आणि पुढें-पुढें तें चांगलेच व्यक्त होतें. म्हातारपणाची लक्षणें प्रगट होतात. शरीराचे बळ उणावते. इंद्रियांची कार्यक्षमता जाते. आणि पुढें जीवन राहिलेंच तर तें भारभूत झालेलें असतें. सामान्यतः हें असें घडते व्यक्तिपरत्वे ५-१० वर्षांचे अंतर राहते इतकेंच. आता जन्मापासून वयाच्या पंचविशीपर्यंत होणारे परिवर्तन हें परिवर्तनच आणि पस्तिशीनंतर अनुभवास येणारा पालट हेहि परिवर्तनच. दोन्हीहि सारखीच इष्ट आणि आवश्यक मानावीत काय?
COPYRIGHT © 2025 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित