हरिभक्ताच्या संगतीत माणसाला बरें वाटतें. त्याची भेट झाली, त्यानें पाहिले, दोन वाक्ये तो बोलला, त्यानें प्रेमळ हाताने कुरवाळले, त्याच्या वरदहस्ताचा थोडासा स्पर्श मस्तकाला झाला, तरी माणसाचा संताप, खेद नाहीसा होतो, मन शांत होतें, वृत्तींना प्रसन्नता लाभते. अशा थोर हरिभक्ताने चार वाक्ये जरी उच्चारली तरी माणसाच्या अंतःकरणांतील नाना प्रकारचे संदेह दूर होतात, श्रद्धा बळावते, बुद्धि स्थिरावते. मात्र यासाठीं हरिभक्ताच्या संगतीत जाणाऱ्याचे मन सरळ असलें पाहिजे, प्रांजळ असलें पाहिजे, तो विनयी असला पाहिजे, अहंकारी असतां कामा नये. नाहीतर पाण्यात अखंड भिजूनहि सुसरीच्या पाठीला मऊपणा जसा येत नाहीं, ती तशीच कठोर, खडबडीत राहते, तसेंच याचेंहि व्हावयाचें.
COPYRIGHT © 2025 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित