साधना ही साधना आहे, सिद्धि नव्हे. त्या मार्गानें प्रयत्न केल्यास सिद्धि मिळू शकते. प्रतिबिंब दिसते तें आरशांत. आरसा स्वच्छ करणाऱ्या चूर्णांत प्रतिबिंब दिसत नाहीं. तसे पाहूं जाणारा वा दिसत नाहीं म्हणून चूर्ण निरुपयोगी मानणारा खुळा ठरतो. ब्रह्मज्ञानापर्यंत नेऊन पोंचविणाऱ्या साधनांकडेहि त्याच दृष्टीनें पाहिलें पाहिजे. हा विवेक केला कीं मग जगताला जड समजण्याचा वा मूर्तीला एक पाषाण मानण्याचा अभागीपणा, करंटेपणा, हातून घडणार नाहीं. परंतु असे घडण्यासाठी अहंकार सोडून, नम्रपणे, परंपरापूत विचार, जुने ठेवणे, जाणून घेतलें पाहिजे.