केवळ बुद्धिवादानें कांहीं पदरांत पडत नाहीं. चांगलें वाईट ठरविता येत नाहीं. पदरांत पाडून घेण्यासाठी चांगलें काय, हें समजून घेण्यासाठी भावनेचाच आधार घेतला पाहिजे. त्याविना गति नाहीं. भावना ही संस्कारांतून पोसली जाते. तिला परंपरेचा, स्वकर्माचा, दीर्घकालाचा आधार असतो. आवडी-निवडी, हवें-नको, केवळ बुद्धिवादानें ठरत नाही. त्यांतील इष्टानिष्ट समजून घेण्यासाठी शास्त्रांचा म्हणजेच निःस्पृह आणि जाणत्या पुरुषांच्या, दीर्घकालीन अनुभव व्यक्त करणाऱ्या, शब्दांचा आधार घ्यावा लागतो.