व्रते-वैकल्यें, पूजा-पाठ, सोवळे-ओवळें, खाण्यापिण्यासंबंधीं नियम, कंजूषपणा वा उधळपट्टी, वेषभूषा, आदरातिथ्य, विषयसेवन या सर्व प्रकरणात माणसाने नेमस्तपणा धरावा. मध्यमक्रम अवलंबावा; मात्र मुळांत हें वागणे शुद्ध, निर्मळ, सदाचारी असावें. या दृष्टीने एक संस्कृत वचन मार्मिक आहे. “अनाचारस्तु मालिन्यम् अत्याचारस्तु मूर्खता । विचाराचारसंयोगः स सदाचार उच्यते ।” वर्षानुवर्ष न धुतलेली धाबळी वा कद हे जसें सोवळें नाही तसेच रस्त्याचीं पायतणें घालून घरांत हिंडणें ही सुधारणाहि नव्हे.