‘विवेक’ शब्दावरून आणखीहि एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे. फार थोर व्यक्तींचे मोठेपण सामान्य मापाने मोजून चालत नाहीं. थोरांची चरित्रे वाचतांना असा मोह फार वेळां होतो. पुष्कळ वेळां भली माणसेंहि या मोहाला बळी पडतांना दिसतात. राज्यत्याग, शूर्पणखेची विटंबना करणें, सुवर्णमृगाच्या मागें लागणे, सीतेच्या विरहाने शोकाकुल होणें, वालीवध, सीतात्याग, शंबूक-दंडन, इत्यादि प्रसंग वस्तुतः रामचंद्रांच्या थोरवीचे अनेकानेक पैलू प्रगटविणारेच आहेत. पण हें नीट समजून घेतलें पाहिजेत, समजून घेताना विवेक केला पाहिजे.