Calendar Day 1

पांच वर्षाच्या लहान अजाण बालकाकडून, त्यानें उपनिषदे वाचली पाहिजेत, समजून घेतली पाहिजेत अशी अपेक्षा कुणी करीत नाहीं; पण मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष जर ‘ज्ञानेश्वरी मी वाचली नाहीं’ असें भूषणाने मिरवीत असेल तर त्याला अभागी वा करंटा म्हणण्यावांचून दुसरें काय म्हणणार?

Calendar Day 2

ज्ञानेश्वरी मी वाचली नाहीं म्हणण्यामागे, आजच्या विज्ञानयुगांतील प्रगत कालाच्या दृष्टीनें अंतराळांत संचार करणाऱ्या, चंद्रावर जाऊन पोचलेल्या मानवाच्या दृष्टीनें, ज्ञानेश्वरींत उपयोगी पडणारे कांही नाही, म्हणून ती वाचण्यांत कांहीं अर्थ नाहीं, असें जाणून मी ती वाचली नाहीं, असें या प्रथितयश साहित्यिकांना म्हणावयाचे असतें. कोठेंहि, कशावरहि भाव नसलेले हे अश्रद्ध तर्कटी स्वतःच्या आणि इतरांच्याहि कल्याणाची हानी करीत असतात.

Calendar Day 3

अश्रद्ध तर्कट्यांचा बुद्धिवाद मोठा विलक्षण असतो. हें सगळे ब्रह्म आहे ना! सच्चिदानंद आहे ना! मग जगांत जडता कशी? दुःखे कां? भयानक विषमता कां आढळून येते? ब्रह्म जर सर्वव्यापक आहे तर शिल्पकार जिला पायाखाली धरून घडवितो त्या दगडाच्या मूर्तीला देव म्हणून वंदनीय का मानावयाचें? तिची पूजा कशाला करावयाची? ब्रह्म जर सर्वत्र ओतप्रोत भरून आहे तर पाप-पुण्याची कल्पना थोतांड नाही काय? पाप-पुण्याच्या कल्पनेवर आधारलेले विधिनिषेध जीवनाचे मार्गदर्शक म्हणून कशासाठी मानावयाचे? इ. इ. आक्षेप त्यांच्याकडून घेतले जातात. खरे म्हणजे अवस्थाक्रम लक्षांत न घेतल्याने हें असें अवास्तव तर्कट केलें जातात.

Calendar Day 4

जगतातील सगळ्या वस्तू धन-ऋण विद्युत्कणांनी भरलेल्या आहेत. त्याच्यावाचून दुसरी वस्तुसत्ता नाहीं, असें आजचे प्रगत विज्ञान सांगते आणि तरी विज्ञानवादी, विज्ञानाचे मान्य पदवीधर वस्तूंची उपयोगिता वा मूल्य एकच मानीत नाहींत. हिरा आणि कोळसा यांच्या उपयोगांत आणि मूल्यांत आकाश-पाताळाचें अंतर राहते.

Calendar Day 5

मूल घटक विद्युत्कण असूनहि त्यांच्या उण्याअधिक प्रमाणांनीं अत्यंत विभिन्न गुणधर्मांचे पदार्थ निर्माण होतात. त्यांच्या क्रिया-प्रतिक्रिया अगदीं वेगवेगळ्या असतात. मानवी शरीरहि अंती त्याच मूल घटकांचे असते. तरी त्याच मूल घटकांच्या विविध वस्तू शरीरावरील परिणामाच्या दृष्टीनें अन्न, औषध आणि विष अशा भिन्न भिन्न गटांत समाविष्ट होतात. मूलभूत एकता आणि एकरूपता, अंतिम सत्य असतांनाहि, त्याची यथार्थता अबाधित असतांनाहि, शरीराच्या पातळीवर अन्न आणि विष हे कधीं सारखेंच मानतां येईल काय?

Calendar Day 6

भूमितींतल्या बिंदुला लांबी, रुंदी, जाडी कांहीं नाही तरी तो जागा व्यापतो; आणि आपण कितीही सूक्ष्मपणे काढलेला कोणताहि बिंदू लांबी, रुंदी, जाडीच्या, विरहित नसतो. मूळांतील व्याख्येचें आतां काय करावयाचें? विज्ञाननिष्ठ म्हणविणाऱ्या आपल्या नित्याच्या व्यवहारात अशा कितीतरी गोष्टी आहेत. त्या खपवून घेणाऱ्यानें परमार्थातील साधकोपयोगी व्यवहारावर आक्षेप घेणे अडाणीपणाचें आहे.

Calendar Day 7

कार्यक्षम इंद्रियाच्या बुद्धिमान् माणसालाहि शरीराच्या म्हणून कांहीं मर्यादा असतात त्या गृहीत धरूनच त्यानें मार्ग काढावयाचा असतो. यासाठींच परब्रह्म, ईश्वर, अवतार, श्रेष्ठ व्यक्ति, अशा अवस्थांचा विचार करणे भाग होतें. दागिना म्हणजे सोने नव्हे पण सोन्याचा स्वीकार करतांना ते कोणत्या ना कोणत्या आकारांत असावयाचेंच. आकाराला महत्त्व नाहीं हें तत्त्वतः मान्य करूनहि दागिन्यांची उपयुक्तता काढून घेतां येत नाहीं, प्रतिष्ठा नाकारता येत नाहीं. म्हणून सोने ओळखावे, दागिना स्वीकारावा. ब्रह्म जाणावे, जगांत राहावे, ईश्वर मानावा, मूर्तिपूजा करावी.

Calendar Day 8

सौंदर्य ही काय वस्तु आहे? ती वस्तुच्या ठिकाणीं आहे कां द्रष्ट्याच्या भावांत राहते, याचा तात्त्विक आणि यथार्थ निर्णय बुद्धिवादाच्या पातळीवर करतां येईल काय? प्रगत विज्ञानयुगाला शोभण्यासारखे निश्चित नियम या प्रकरणांत सांगतां येतील काय? आणि तरी जाणत्या रसिकाला वाङ्‌मय, चित्र, शिल्प, नृत्य, संगीत, या कलांचा आस्वाद घेऊन आनंदाचा अनुभव मिळतो कीं नाहीं? पतिव्रतेचें प्रेम, मातेचे वात्सल्य, देशभक्ताची भावना, चारित्र्यसंपन्नांचे व्यवहार, यांना भौतिक नियमांची कसोटी लावता येईल काय?

Calendar Day 9

रसायन आणि पदार्थविज्ञान शास्त्रांपेक्षां मानसशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र वेगळेपणानें स्वीकारावे लागतें की नाहीं? जीवशास्त्राचे नियम केवळ रसायनशास्त्राच्या आणि पदार्थविज्ञानाच्या चौकटीत बसवता येतील काय? यातले जर काहीच होत नसेल आणि तरी पदार्थविज्ञानशास्त्र किंवा त्याहिपेक्षा सूक्ष्म असे परमाणूविज्ञानशास्त्र जर मूलभूत सत्य असेल तर ‘सर्व खल्विदं ब्रह्म’ या वेदान्तावर आक्षेप घेता येणार नाहीत.

Calendar Day 10

राज्यशासन आणि परमाणूविज्ञान याचा जितका संबंध आहे, त्यापेक्षा मूर्तिपूजादि साधनांचा वा पापपुण्य कल्पनेवर आधारलेल्या विधिनिषेधांचा ‘सर्व खलु इदं ब्रह्म’ या तत्त्वज्ञानाशी अधिक निकटचा संबंध आहे. तो समजावून घ्यावयाचाच नाहीं वा तो जाणून घेण्यांत अर्थ नाहीं, असे ठरविले असल्यानें आपल्या परंपरागत आचार-विचारांचें वास्तव महत्त्व लक्षांत येत नाहीं.

Calendar Day 11

श्रद्धेला, भावनेला, विश्वासाला, बुद्धी इतकेच, तर्का इतकेच, किंबहुना थोडे अधिक मूल्य आहे. बुद्धि त्याज्य नाहीं पण भावना अधिक उपयुक्त आहे. आरंभापासून शेवटपर्यंत साथ देणारी आहे. बुद्धीने भावनेचा तोल राखावा. श्रद्धेचा रस्ता स्वच्छ करावा. भावनेची सेविका व्हावे, सखी व्हावे. स्वामिनी होण्याची अपेक्षा धरू नये.

Calendar Day 12

केवळ बुद्धिवादानें कांहीं पदरांत पडत नाहीं. चांगलें वाईट ठरविता येत नाहीं. पदरांत पाडून घेण्यासाठी चांगलें काय, हें समजून घेण्यासाठी भावनेचाच आधार घेतला पाहिजे. त्याविना गति नाहीं. भावना ही संस्कारांतून पोसली जाते. तिला परंपरेचा, स्वकर्माचा, दीर्घकालाचा आधार असतो. आवडी-निवडी, हवें-नको, केवळ बुद्धिवादानें ठरत नाही. त्यांतील इष्टानिष्ट समजून घेण्यासाठी शास्त्रांचा म्हणजेच निःस्पृह आणि जाणत्या पुरुषांच्या, दीर्घकालीन अनुभव व्यक्त करणाऱ्या, शब्दांचा आधार घ्यावा लागतो.

Calendar Day 13

शास्त्रवचनांवर, संतवचनांवर विश्वास ठेवला नाहीं आणि अंतःकरणांत भाव नसेल तर काहीहि चांगलें म्हणून घडणे शक्य नाहीं. हिताचा मार्ग दिसणार नाहीं. आपलें आपल्यालाच पहावयाचे असते, पण त्यासाठीं आरसा चांगला आणि स्वच्छ असावा लागतो. आरशाची कांच समतल नसली, त्यांत जर उंच-सखलपणा असला किंवा आरशावर मळ साचला असला, तेलकटपणामुळें तो पक्का झाला असला, तर आरशांत दिसणारे आपलेंच प्रतिबिंब जसें दिसावयास पाहिजे तसें दिसत नाही म्हणून आरशाची कांच निर्दोष असावी लागते आणि तिच्यावरचा मळ कांहीं रासायनिक चूर्णे वा औषधी द्रव्यें यांनीं काढावा लागतो. आपल्या अंतःकरणाचे तसेंच आहे.

Calendar Day 14

मानवाचे अंतःकरण यमनियमांनीं समतल होतें आणि ध्यानपूजनादि साधनानी स्वच्छ होतें. मग “अहं ब्रह्मास्मि”चा साक्षात्कार होतो आणि “सर्वं खल्विदं ब्रह्म” अनुभवास येते. ध्यानादि साधनेने मी ब्रह्म आहे असा साक्षात्कार झाला कीं मग भोवती दिसणारे, भासणारे जगत् हि ब्रह्मावांचून वेगळे नाहीं, तें सर्व जसेच्या तसे ब्रह्मरूपच आहे, ब्रह्मच आहे, असे प्रत्ययास येतें.

Calendar Day 15

साधना ही साधना आहे, सिद्धि नव्हे. त्या मार्गानें प्रयत्न केल्यास सिद्धि मिळू शकते. प्रतिबिंब दिसते तें आरशांत. आरसा स्वच्छ करणाऱ्या चूर्णांत प्रतिबिंब दिसत नाहीं. तसे पाहूं जाणारा वा दिसत नाहीं म्हणून चूर्ण निरुपयोगी मानणारा खुळा ठरतो. ब्रह्मज्ञानापर्यंत नेऊन पोंचविणाऱ्या साधनांकडेहि त्याच दृष्टीनें पाहिलें पाहिजे. हा विवेक केला कीं मग जगताला जड समजण्याचा वा मूर्तीला एक पाषाण मानण्याचा अभागीपणा, करंटेपणा, हातून घडणार नाहीं. परंतु असे घडण्यासाठी अहंकार सोडून, नम्रपणे, परंपरापूत विचार, जुने ठेवणे, जाणून घेतलें पाहिजे.

Calendar Day 16

तत्त्वज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान हे कांहीं इतर पदार्थजाताच्या ज्ञानाप्रमाणें बाहेरून मिळणारे उपरे ज्ञान नाहीं. आत्मा काय, ब्रह्म काय किंवा ईश्वर काय, हे कुठे तरी बाहेर विशिष्ट स्थलीं, दूर अंतरावर आहेत असें नाहीं. शास्त्र सांगते – “तत्त्वमसि” तेंच तूं आहेस. ज्याला मी म्हणजे जीव समजतोस तो आत्मा म्हणजे ब्रह्मच आहे. भगवंत स्वतःच गीतेत सांगत आहेत कीं- “ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति।” (भ. १८|६१) ईश्वर हा प्रत्येक प्राणिमात्राच्या हृदयांत वास करतो.

Calendar Day 17

“तुझें आहे तुजपाशी। परि तूं जागा चुकलासी॥” अशी माणसाची स्थिति असते. खरें म्हणजे असें होऊं नये; पण असें होतें हें खरें. अगदीं व्यावहारिक, इंद्रियगम्य अशा गोष्टींतहि या विस्मृतीचा अनुभव येतो. आपण नेमकी सापडावी म्हणून आवर्जून एखादी वस्तु ठेवलेली असते आणि पाहिजे तेव्हां शोध करूनहि ती सांपडत नाहीं, असें कितीदा तरी होतें.

Calendar Day 18

वेड्याची अवस्था तर या दृष्टीने निश्चितच विचारांत घेण्यासारखी आहे. आपण वेडे आहोंत हें न कळणे, हे वेडाचे मोठेच लक्षण आहे. माणसाचे आत्म्याविषयीचे अज्ञान या वेडासारखेच आहे. ब्रह्म मायेने आवृत आहे. पुरुष प्रकृतीच्या पाशांत गुंतलेला आहे. चांगला बुद्धिमान् माणूसहि मूढ ठरतो तो यामुळेंच. तो मायेच्या प्रभावांतून दूर होऊं शकत नाहीं. प्रकृतीच्या अंगभूत अशा सत्त्व-रज- तमाचा पडदा त्याच्या ज्ञानशक्तीला कुंठित करतो. सत्यापेक्षा त्याच्या झाकणाचेच आकर्षण त्याला वाटते, जशी पुष्कळ तेले बाटलीचा सुंदर आकार आणि चित्रविचित्र रंगांचे सुरेख वेष्टण यामुळेंच अधिक खपतात. तेलांतले गुण विचारांत घेतले जातच नाहीत. मनुष्य आत्मज्ञानापासून दुरावतो तो हा असा.

Calendar Day 19

मनुष्याला वेड्यासारखी आत्मविस्मृति झालेली असते. खुळ्या गिऱ्हाइकासारखा तो वेष्टणाला भुलतो. सत्यापर्यंत पोचू शकत नाहीं. कांहीं वेगळे सत्य यामागे आहे आणि ते जाणून घेतलें पाहिजे असेहि त्याला वाटत नाहीं. ज्ञानाची साधनें असलेली इंद्रिये, मन, बुद्धि ही सर्व उण्याअधिक प्रमाणांत सत्त्वरजतमांनीं व्यापलेली राहतात, म्हणून दूषित असतात. ती सत्याचे यथार्थज्ञान करून देऊं शकत नाहींत. खरें हित कशात, खरें सुख कशात, तें कळत नाहीं, आणि मग स्वाभाविकपणेंच नानाप्रकारचीं दु:खे भोगावी लागतात.

Calendar Day 20

ज्याचा त्याग केला पाहिजे तें टाकावेसे वाटत नाहीं, घेऊं नये ते स्वीकारावेसें वाटतें, करूं नये तें केलें जातें. आणि मग दुःख भोगण्यावांचून गति नसते. अंतःकरणाची, अंतःकरणवृत्तीची, या गुणांच्या पाशांतून सुटका झाली तरच खरें काय ते कळेल, आणि दुःख टळेल, पण हेंच अवघड आहे. भगवंतांनीं अर्जुनाला निस्त्रैगुण्य हो असें सांगितलें आहे तें यादृष्टीनेंच.

Calendar Day 21

वृत्तीवरील गुणांचे संस्कार इतके बलवान असतात कीं त्यांतून सुटण्यासाठी केलेल्या जाणत्या माणसाच्या प्रयत्नांनाहि यावे तसे यश येत नाहीं. ईश्वराच्या कृपेची, भगवत्प्रसादाचीच, त्यासाठीं अपेक्षा असते. सत्यदर्शनासाठी भगवंताचीच करुणा भाकावी लागते, प्रार्थना करावी लागते की-हे भगवन्! अत्यंत आकर्षक असल्यानें, सत्याला लपविणाऱ्या या सोन्याच्या झांकणाला दूर करणें, काढून टाकणें, आमच्या शक्तीच्या बाहेरचे आहे. आपणच प्रसन्न व्हा आणि दयाळूपणानें हें झांकण काढून द्या. तरच सत्य पाहण्याची इच्छा असणाऱ्या आम्हांला सत्याचे दर्शन होईल. ही प्रार्थना ईश्वरानें ऐकावी असा उत्कट भाव हृदयात नसतो, नम्रता नसते, अहंकाराने प्रार्थनेचें महत्व समजत नाही, आणि मग आपलीच जुनी ठेव आपल्याला गवसत नाहीं.

Calendar Day 22

जुनें ठेवणें म्हणजे आपली परंपरा, आपलें धर्मशास्त्र, आपलें अध्यात्म, आपला अर्थकामाचा विचार, आपल्या भारतवर्षामध्ये मान्यता प्राप्त असलेली समाजविषयक धारणा, आपले नीतिनियम, आपलें तत्त्वज्ञान, आपला प्राचीन इतिहास, वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, हें आपलें वाङ्‌मय माणसाला पशुत्वातून देवत्वाच्या पदवीवर नेऊन सोडणारे, नराचा नारायण करणारे, सामान्यालाहि सत्पुरुषाच्या पदावर चढण्याची संधी देणारे, सर्वांची सोय करून हितापर्यंत पोंचविणारें आहे.

Calendar Day 23

आपले जें सगळे आपले जुनें ठेवणें आहे. ते फार जुने आहे, वेदाइतके, महाभारताइतकें प्राचीन आहे. इतिहास संशोधकांना चक्कर यावी इतक्या पूर्वीचा हा काळ आहे, आणि त्यामुळेंच माणसाला ऐश्वर्यशाली बनविणारा हा समृद्ध ठेवा सहजासहजी ओळखता येत नाहीं. त्यासाठीं सायास केले पाहिजेत, प्रयत्न केले पाहिजेत, दक्षतेने, विवेकाने, सातत्याने श्रम केले पाहिजेत. आळस करतां कामा नये, दीर्घकालपर्यंत कराव्या लागणाऱ्या कष्टांना कंटाळता कामा नये. आंब्याच्या झाडाची फळे रोप लावताच चार सहा महिन्यांत हातीं पडत नाहीत, ५-१० वर्षें त्याकरिता वाट पहावी लागते, हे लक्षांत ठेवले पाहिजे.

Calendar Day 24

माणसाला कोणाचें तरी मार्गदर्शन पत्करावे लागते. माणसाचे हें वैशिष्ट्य आहे. पाहिजे तर वैगुण्यहि म्हणावें. माणसाला शिकविणारा, समजावून देणारा लागतोच लागतो. नैसर्गिक प्रेरणेने त्याला फारच थोडे साधणे शक्य आहे, त्यादृष्टीनें तो पशुपक्ष्यांइतका किंवा कृमिकीटकांइतकाहि स्वतंत्र नाही. सर्व जीवकोटीमध्यें मनुष्य श्रेष्ठ खरा पण हें श्रेष्ठत्व अनुभविण्यासाठीं त्याला पदोपदी मार्गदर्शन पत्करावे लागतें.

Calendar Day 25

माणसाला आपलें हित, आपलें कल्याण, आपली प्रगति, आपली उन्नति साधावयाची असेल तर माणसाने जाणत्याचे, ज्ञात्याचे, तज्ञाचे पाय धरले पाहिजेत. आपल्या बुद्धिमत्तेचा अहंकार दूर सारून अनुभवी पुरुषाला शरण गेलें पाहिजे.

Calendar Day 26

ज्ञान देणारा सत्पुरुष निःस्पृह, उदार, कनवाळू असला तरी ज्ञान घेणाराची पात्रता सिद्ध व्हावी लागते. ती विनम्रपणे नमस्कार करण्याने, जिज्ञासेने, विनयाने पुन्हा पुन्हा प्रश्न विचारल्यानें आणि आळस न करतां केलेल्या सेवेने सिद्ध व्हावयाची असते. यासाठींच गीतेने ‘तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया।‘ मग “उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः” (भ. ४|३४) असें म्हटलें आहे.

Calendar Day 27

आपण शिष्टाचार म्हणून, एक रूढी म्हणून किंवा मनांत नसले तरी लौकिकामध्ये नम्रता सिद्ध व्हावी म्हणून, नमस्कार करणें, जमिनीवर डोके टेकणें, पायांवर डोके ठेवणे, साष्टांग दंडवत घालणे, असें नमस्काराचे अनेक प्रकार करतो. पण त्यांत खरा विनय, खरा भाव, खरी श्रद्धा असते का?

Calendar Day 28

पायांवर डोके ठेवून परस्परांना नमस्कार करण्याची पद्धत रूढ असली आहे. पण ते खरोखरीच निरहंकारी वृत्तीनें घडते काय? ज्याच्या पायावर डोके ठेवून नमस्कार करावयाचा, त्याच्या विषयीं नमस्कार करणाराच्या अंतःकरणांत जर द्वेष, मत्सर, निंद्यतेची भावना असेल तर पायावर डोके ठेवणे या क्रियेला कांहीं अर्थ राहात नाहीं. पाय हे शरीरावयवामध्ये निकृष्ट. डोके हे शरीरावयवांमध्यें उत्कृष्ट. म्हणून त्याला उत्तमांग असें म्हणतात. माझें हें मस्तकहि तुमच्या पायांपेक्षा कमी योग्यतेचें आहे, अशी परमादराची भावना वंदनकर्त्याच्या मनांत असावयास हवी. पण तशी बहुधा नसते. त्यामुळे असा हा नमस्कार एक उपचार मात्र ठरतो.

Calendar Day 29

ज्ञानसंपादनासाठीं ज्यानें नमस्कार करावयाचा त्या जिज्ञासूच्या अंतःकरणांत त्यावेळीं आदर नि नम्रता हे भाव असलेच पाहिजेत. श्रद्धा, विश्वासाचींच तीं अंगें आहेत. ज्ञान मिळवावयाचें तर जिज्ञासू श्रद्धायुक्त, तत्पर आणि संयमशील असावाच लागतो तरच ज्ञान मिळते. “श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः।” (भ. ४|३९) असें गीतेने स्पष्टपणे म्हटलें आहे.

Calendar Day 30

ज्ञान मिळवावयाचे तर गुरूची त्यासाठी नितांत आवश्यकता आहे कारण गुरुवाचून प्राप्त झालेलें ज्ञान असावें तसें यथार्थ असत नाहीं.

Calendar Day 31

देहबुद्धि सोडल्यावांचून आपणांत सुधारणा होणार नाहीं. इंद्रियसुखांना सर्वस्व समजणाऱ्या देहात्मवादाचा, भौतिक प्रगति म्हणजेच सगळे कांहीं असें मानणाऱ्या जडवादी तत्त्वज्ञानाचा, त्याग केल्यावांचून जें हिताचे आहे, आपल्या स्वाधीन आहे, तें आपण जाणूं शकणार नाहीं. देहबुद्धीचा निषेध संतांनी ठायीं ठायीं केला आहे तो यासाठींच.