Calendar Day 1
समजावून सांगण्यासाठीं सांगणारांनीं स्वतःच्या धारणेप्रमाणे विवर्तवादाचा वा परिणामवादाचा आश्रय करावा. या वादांचे निरनिराळ्या दृष्टिकोनांतून आणखी प्रकार पाडावेत. त्याला आपल्या रुचीप्रमाणे मायावाद, अनध्यस्त, विवर्तवाद, अविकृत परिणामवाद, चिद्विलासवाद अशी नांवें द्यावीत. वचनांचे कीस काढावेत. शब्दांचे ध्वनी शोधावेत आणि चर्चा करावी. फल शेवटीं एकच; आणि तें म्हणजे ‘निश्चित कांहीं सांगतां येत नाहीं’ हें!
Calendar Day 2
विचाराला चालना मिळविण्यासाठी वादविवादाचा, चर्चेचा थोडा-बहुत उपयोग होतो, नाहीं असें नाही. प्रकृतिभेदानें प्रत्येकाची पातळी आणि रुचि वेगवेगळी असल्यानें त्यांना मानवेल अशी मतप्रणाली या विविध प्रकारच्या चर्चेतून उपलब्ध होते. तेव्हां साधकाने आपल्या प्रवृतीला जें भावते तें निवडून घ्यावें. हाच विवेक. आणि मग एकनिष्ठेनें सतत प्रयत्नशील राहून आपल्या ध्येयाशी एकरूप होतां येईल अशी साधना करावी.
Calendar Day 3
कोणतेहि तत्त्व केवळ शब्दाच्या बळावर कधीहि जाणले जात नाहीं. तें अनुभवासच यावें लागतें. तेंच ब्रह्माच्या संबंधांतहि होतें. एक जुने वचन आहे “कसें बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला।” बोटाने दाखवितां येण्यासारखी, ही अमुक अमुक म्हणून वर्णन करून सांगण्यासारखी, ब्रह्म ही वस्तु नाहीं. ती अनुभवास येऊ शकते. गाढ झोपेसारखे हें आहे. म्हणून तर शास्त्रकारांनीं निद्रेला ब्रह्मानंदसहोदर असें विशेषण दिलें आहे.
Calendar Day 4
सामान्यतः प्रत्येक मनुष्य रोज गाढ झोप अनुभवत असूनहि, ती असते तेव्हां तिची जाणीव नसते. कशी येते, आली म्हणजे काय होतें वा तिचें स्वरूप काय? याचें निश्चित वर्णन करतां येत नाहीं. ब्रह्मानंदाचे तसेंच आहे. गाढ झोप लाभावी म्हणून जसें सर्व जीवन कांहीं नियमानें नियंत्रित करावे लागते, तसेंच ब्रह्मानंदाच्या अनुभवासाठीहि साधना करावी लागते.
Calendar Day 5
शांत झोप हा शरीराचा नैसर्गिक असा जड विकार असूनहि हवे तसें करीन, हवा तसा वागेन, हवे ते खाईन वा खाणार नाहीं असें म्हणून चालत नाहीं. यातल्या अनेक गोष्टींमुळें झोप दुरावते आणि रात्ररात्र तळमळत काढावी लागते वा निद्रानाशाचा हा विकार टाळण्यासाठीं अधिक घातक अशा विषारी द्रव्याचा उपयोग करावा लागतो. म्हणून निद्रेचे सुख अनुभवावयाचें असेल तर जीवन हें आरोग्यशास्त्राचे नियम सांभाळून जगावें लागतें. आळस वा अतिश्रम, उपासमार वा अजीर्ण, आत्यंतिक अभिलाषा, क्रोध, चिंता, भय, शोक यांचा त्याग करावा लागतो.
Calendar Day 6
शांत झोपेसारखे जे सहजप्राप्त असावयाचे त्या विषयांतसुद्धा बरीच दक्षता घ्यावी लागते तर जन्मजन्मान्तरींच्या अनिष्ट संस्कारांनीं विकृत झालेल्या अंतःकरणवृत्तींना, ब्रह्मज्ञानाच्या अनुभवास मुकावें लागेल, यांत कांहींच आश्चर्य नाही. स्वतःच्या जीवनक्रमांत, इंद्रियांच्या प्रवृत्तीत, अंतःकरणाच्या धारणेत, ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीनें अनुकूल परिवर्तन झाल्यावांचून ब्रह्मज्ञान होणें दुरापास्त आहे.
Calendar Day 7
ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावयाचे त्यासाठीचे अनुकूल परिवर्तन, मार्गदर्शनाशिवाय होणें दुर्घट आहे. यासाठींच अनंत शोधून पाहण्याआधी संत शोधून पाहिला पाहिजे.
Calendar Day 8
ब्रह्माशी तदाकारता यावयाची, ब्रह्मरूप व्हावयाचे, म्हणजे माझें आणि मी हे दोन्ही भाव सुटावे लागतात. “मी” मुळे “माझें” वाढत जाते आणि “माझे” मुळें “मी” पुष्ट होत जातो. यामुळे साधनक्रमांत ‘माझें’ कमी व्हावें या उद्देशाने अस्तेय, अपरिग्रह, संयम, वैराग्य या गुणांचा स्वीकार करावयास सांगितला आहे. हे गुण चांगले जोपासले, इंद्रिय-मन-बुद्धीच्या पातळीवरहि ते चांगले बाणले म्हणजे ‘मी’ सुटणे सोपे जातें, शक्य होतें. हा साधनाक्रम व्यक्तिपरत्वे नेमकेपणानें सांगण्यासाठी अनुभवी मार्गदर्शक लागतो. संत तसा असतो. तो मिळाला कीं अनंताचा शोध घेणे सुकर होते.
Calendar Day 9
उपनिषदांमध्ये ब्रह्माचें वर्णन करतांना “यत् चक्षुषा न पश्यति येन चक्षूंषि पश्यति l तदेव ब्रह्म त्वं विद्धि ll” (केन १/६) असें वर्णन केले आहे. डोळे ज्याला पाहूं शकत नाहींत पण डोळ्याला पाहण्याचे सामर्थ्य ज्याच्यामुळे प्राप्त होतें, तें ब्रह्म आहे, असें तूं जाण असा उपदेश तेथे आहे. त्याच्याच पुढें मनानें ज्याचें चिंतन होऊं शकत नाहीं पण मनाला चिंतन करण्याचे सामर्थ्य ज्याच्या शक्तीने मिळते तेंच ब्रह्म म्हणून ओळखावे असेहि तिथे सांगितलें आहे.
Calendar Day 10
जो अनंत शोधावयाचा आहे, तो चर्मचक्षूंनी दिसण्यासारखा नाहीं वा इतर इंद्रियांनींहि त्याचें ज्ञान होण्यासारखे नाहीं. डोळे येथें उपलक्षणासारखे आहेत. डोळ्यांनी दिसणार नाहीं, म्हणजे कोणत्याच इंद्रियांनी समजणार नाहीं असें येथें सांगावयाचें आहे.
Calendar Day 11
मन, बुद्धी ही कान, नाक, डोळे या इंद्रियांच्यापेक्षां अधिक तीक्ष्ण, सूक्ष्म, व्यापक आणि दूरगामी सामर्थ्य असलेली ज्ञानसाधने आहेत. त्यांनाहि ब्रह्माचें ज्ञान करून घेण्याच्या विषयांत फारच थोडे साधते. खरें म्हणजे कांहींच साधत नाहीं. क्वचित् समजल्यासारखे वाटतें पण तें फसवे असते. डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा हे चर्मचक्षू आणि मन, बुद्धि हे ज्ञानचक्षू हे दोन्ही ब्रह्मापुढें पांगुळतात.
Calendar Day 12
ब्रह्माला पाहूं गेले म्हणजे पाहणेच नाहींसें होतें. ज्ञाता आणि ज्ञेय असें कांहीं उरतच नाहीं. मिठाच्या बाहुलीने समुद्राचा तळ शोधण्याचा प्रयत्न करावा म्हणजे जसें होईल तसेंच ब्रह्म पाहाणाराचे होतें. पाहण्यासाठी पाहणारा आणि जें पाहावयाचे ते वेगळे असावे लागतात, वेगळे रहावे लागतात. फार जवळीक सुद्धा पाहण्याच्या क्रियेला प्रतिकूल असतें. डोळ्यांत घातलेले काजळ यामुळेंच दिसूं शकत नाहीं. येथे नुसती जवळीक नाहीं तर एकरूपताच असते. तेव्हां कोण कोणाला पाहणार? “तत्र केन कं पश्येत्” असा हा पाहणेपणा गळून पडतो असें जेथें घडते, तेथें जाऊन पोचणें म्हणजेच ब्रह्माचा शोध घेणे आहे.
Calendar Day 13
ब्रह्म निर्गुण, निराकार आहे. इतर इंद्रियांच्यापेक्षां रूप या विषयाचें ग्रहण करणारे नेत्र हें इंद्रिय, हें अधिक व्यापक कार्यक्षेत्रांत प्रभावी ठरत असल्यानें त्याच्या विषयांत जें सत्य आहे तें इतरहि इंद्रियांना लागू पडण्यासारखे असल्यानें वर्ण हा विषय प्रधान मानून त्याचा ऊहापोह केला आहे. ब्रह्माला कोणताहि रंग नाहीं, तें पिवळे नाहीं, पांढरे नाहीं, सावळे नाहीं, निळे नाहीं आणि असें असल्यामुळें ते व्यक्त वा अव्यक्त कांहींच सांगता येत नाही, ते अनिर्वचनीय आहे.
Calendar Day 14
वस्तूची लांबी-रुंदी-जाडी किंवा उंची वा खोली म्हणजेच वस्तूचा आकार डोळ्यांनी दिसतो असें आपण मानीत असलो तरी वस्तूचा रंग तेवढाच डोळ्यांना दिसत असतो. भिन्न पार्श्वभूमीवर किंवा छायाप्रकाशाच्या साहाय्यानें आपणांस आकारादि गोष्टीचें ज्ञान होतें. ज्याला रंगच नाहीं, त्याचें रूप दिसणें शक्यच नाही. म्हणून वर्णहीन ब्रह्म व्यक्त होऊं शकत नाहीं.
Calendar Day 15
ब्रह्माला अस्तित्व आहे. दृश्य जगताचा तें आधार आहे. अनेक प्रकारच्या विविधतेचे तें अधिष्ठान होऊं शकते त्यामुळें ब्रह्म हें संपूर्ण अव्यक्त आहे असेंहि म्हणतां येत नाहीं. ‘म्हटले तर आहे’ ‘म्हटलें तर नाही’ ही वर्णनाची शुद्धिपत्राप्रमाणे पुणेरी प्रथा माणसाला घोटाळ्यांत पाडते. नेमके ज्ञान देऊं शकत नाही. पण ब्रह्माची वस्तुस्थितीच अनिर्वचनीय असल्यानें, नाना प्रकारचे सिद्धांत त्याच्या आधारावर नांदतात, मतप्रणाली जन्मास येतात, संप्रदाय उभे राहतात, द्वैत, द्वैताद्वैत, विशिष्टाद्वैत, शुद्धाहेत, अद्वैत अशीं तत्त्वज्ञाने साकारतात. ज्याला कांहींच करावयाचें नसते त्या बुद्धिवाद्याला हा गोंधळ वाटतो.
Calendar Day 16
जिची झेप ब्रह्मापर्यंत पोचण्याची शक्यता नाहीं अशा केवळ बुद्धीचा आधार घेतला म्हणजे मन गोंधळून जाते. आंधळ्याने चित्राचे मूल्य ठरवावे, बहिऱ्याने संगीताचा सुरेलपणा निश्चित करावा, तसेच हें आहे. ब्रह्म ही तर्काने कळणारी वस्तु नाहीं. निःस्पृह जाणत्यांवर, कनवाळू संतांवर, दृढ विश्वास ठेवून त्यांच्या आदेशाचे श्रद्धेने पालन केलें तरच ब्रह्मापर्यंत पोचता येईल. मुक्त होता येईल.
Calendar Day 17
विश्वास हाच कुठेहि कार्याचा प्रेरक असतो. अंतःकरणांत विश्वास नसता तर शास्त्रज्ञांनीं प्रयोग केलेच नसते. पुन्हा पुन्हा अपयश येऊनहि नवीन नवीन प्रयोग करावेसे वाटतात, ते विश्वासाच्या बळावरच. साधना अशीच करावयाची असते. तिचें मार्गदर्शन शास्त्र, संत, सद्गुरु करीत असतात. त्यांच्यावर भरंवसणें आणि उपासना करीत राहणे हाच अनंत, निस्सीम अशा सत्याला, सर्वव्यापक अशा ब्रह्माला शोधण्याचा मार्ग आहे.
Calendar Day 18
सारखे सारखे शोधीत गेलें म्हणजेच शोध लागतो. पुन्हा पुन्हा बोधाचे ग्रहण केलें म्हणजेच बोध होतो. एकदां ऐकून वा रोज नवें-नवें ऐकून वा वाचून मनाला बोध होत नाहीं. सगळे नीटपणे आकळत नाहीं, उलगडत नाहीं. जें ऐकले वाचले त्यावर चिंतन-मनन-निदिध्यासन सातत्याने घडले पाहिजे. “श्रुतं हरति पापानि” हा अगदींच प्राथमिक विचार आहे. खेदाची गोष्ट अशी कीं फक्त हा एवढाच विचार कार्यवाहीत आहे.
Calendar Day 19
कीर्तने-प्रवचने-व्याख्याने यांना श्रोत्यांच्या आवडीनुरूप आणि वक्त्याच्या कौशल्यानुरूप पुष्कळ माणसे जमतात, खूप दाटी होते. पण एवढेच होतें. वक्त्यानें काय सांगितलें म्हणून थोड्या वेळाने विचारले तर तें नीटपणे कुणी सांगू शकत नाहीं. थट्टा, विनोद गोष्ट क्वचित् लक्षांत राहते. वक्त्यानें हा आपल्याला टोमणा मारला आहे असें श्रोत्याला वाटलें तर तोहि लक्षांत राहतो. पण कोणत्या सिद्धांताच्या वा साधनेच्या संदर्भांत हें आलें आहे, तें कोणाच्या लक्षांत नसते. याचें खरें कारण असें कीं श्रवण हा काही लोकांचा मनोरंजनाचा, वेळ घालविण्याचा किंवा पुण्य लागते या कल्पनेचा विषय असतो. सिद्धांत समजून घेतले पाहिजेत आणि तद्नुसार साधना केली पाहिजे, या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्षच नसते. म्हणून त्या लक्षांत राहत नाहींत.
Calendar Day 20
केवळ श्रवणच नव्हे तर त्या सवें चिंतन-मननावरहि भर दिला पाहिजे. शोध लागणे किंवा बोध होणें, या सहजासहजी होणाऱ्या, साधणाऱ्या गोष्टी नव्हेत. त्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. इहलोकाशी संबद्ध असलेल्या जड अशा विज्ञानातील सृष्टीचे नियम शोधतानांहि संशोधक शास्त्रज्ञांनी आपली आयुष्येच्या आयुष्ये वेचली आहेत. आपल्या सर्वशक्तीनिशी दीर्घकालपर्यंत चिंतनाचे आणि प्रयोगाचे कष्ट उपसले आहेत. वेडयाप्रमाणे इतर सर्व विसरून एकेका गोष्टीचाच पाठपुरावा केला आहे. इहलोकींच्या जड विज्ञानांत असें होतें तर परात्पर चैतन्याचे आकलन होण्यासाठीं “असेल माझा हरी l तरी मज देईल खाटल्यावरी ll” म्हणून कसें चालेल ? त्यासाठीं आपल्या सर्व शक्तीनिशी सतत प्रयत्न करीत राहिले पाहिजे.
Calendar Day 21
सत्याचा शोध घेणे असो वा त्या तत्त्वाचा मनाला बोध व्हावयाचा असो, दोन्हीसाठी अनुभवी जाणत्याचे मार्गदर्शन वरचेवर मिळाले पाहिजे, मिळवले पाहिजे. यासाठीच सत्पुरुषाच्या संगतीचा महिमा गायिलेला आहे.
Calendar Day 22
सत्संगतीचा लाभ होण्यासाठी केवळ यांत्रिक सहचर्य उपयोगी पडत नाहीं. साधकाच्या अंतःकरणांत, साधनेविषयी, सत्याच्या ज्ञानाविषयीं आणि ज्याच्या संगतींत राहावयाचे त्या सत्पुरुषाविषयी, सद्गुरुविषयी अनुराग असला पाहिजे. प्रेम असलें पाहिजे, भक्ति असली पाहिजे. तरच सत्याचा निश्चय करतां येईल किंवा बोध स्थिरावेल. अन्यथा अखंड पाण्यांत राहूनहि आतून कठिण व वरून कोरडा असलेल्या नर्मदेतल्या गोट्यासारखी त्याची स्थिति होईल.
Calendar Day 23
तत्त्वाचा झाडा देण्याचे चातुर्य जरी पुष्कळ असलें तरी अंतःकरणाची साक्ष पटेपर्यंत, सत्याचा निर्णय केवळ शब्दपांडित्यानें होऊं शकत नाहीं.
Calendar Day 24
घटपटाची खटपट किंवा अवच्छेदकावछिन्नाची लटपट यांच्या सहाय्याने, दुर्बोध पारिभाषिक संज्ञांच्या आधारावर, प्रक्रियांचे प्रतिपादन पुष्कळ कौशल्याने केलेलें आढळतें. जगद्गुरू श्रीशंकराचार्यांनीं प्रतिपादलेल्या अद्वैत मतांतहि “सर्वं खलु इदं ब्रह्म” हा सिद्धांत सिद्ध करणाऱ्या निरनिराळ्या १२८ प्रक्रिया आहेत असें म्हणतात. एखाद्याने त्या सर्वांचा खूप परिश्रमपूर्वक अभ्यास केला तर तो विद्वान् म्हणून मान्यता पावेल पण साक्षात्कारी होऊं शकणार नाहीं. हें सर्व वक्तृत्वामुळें वा प्रबंधामुळें लौकिकाचे साधन ठरेल, पण त्यांतून अनुभव उपलब्ध होऊं शकणार नाहीं, त्यासाठीं अंतःकरणानेंच निवाडा व्हावयास हवा, बुद्धीनेच विवेक केला पाहिजे.
Calendar Day 25
ज्याची चर्चा केली जाते, ज्याविषयी खूप बोलले जाते, वादविवाद रंगतात, ते मूळ सत्य वा तत्त्व साररूपाने खरोखरीच शब्दांच्या पसाऱ्यापेक्षां वेगळेच राहते. सगळ्या दिसणाऱ्या, भासणाऱ्या, विविधतेंत तें भेदातीतपणें एक असेंच राहते. विविधतेतील कोणत्याहि गुणाचा स्पर्श त्याला होत नाहीं. त्याचें स्वरूप वर्णनातीत असें आगळेच आहे. म्हणून तर अनुभवासाठी फार परिश्रम करावे लागतात. वरवरच्या शाब्दिक ज्ञानानें तें साधत नाहीं. खरोखरीचे समाधान प्राप्त करून घ्यावयाचे असेल, अंतःकरण सर्वदा तृप्त, शांत, प्रसन्न राहावें असें वाटत असेल तर वरवरचे उपचार त्यासाठीं पुरेसे नाहीत.
Calendar Day 26
पिंडज्ञान म्हणजे शरीरासंबंधीचें ज्ञान. यांत पांच कोशांचा विचार येतो. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय, असे एकाच्या आंत एक असलेले, अधिक सूक्ष्म आणि तरल होत जाणारे, हे पांच कोश आहेत. शरीर, इंद्रिये, मन, बुद्धि, यांच्या सखोल विचार या पिंडज्ञानात समाविष्ट होतो. शरीर आणि तदंतर्गत इंद्रियादि भाव हे, आचरणारा, कर्ता या दृष्टीने उपासनेचे एक महत्त्वाचें अंग असल्यानें त्यांच्याविषयीचे ज्ञान करून घेणे आवश्यक होतें. तत्त्वज्ञान या शब्दाने येथें पिंडाव्यतिरिक्त सृष्टिचा विचार केला आहे. सृष्टीची उत्पत्ति, तेथील क्रम, उत्पत्तीची मूळ प्रेरणा, उत्पत्तीचे अधिष्ठान या सर्वांचा विचार येथें येतो. पंचमहाभूतांचा विचार हा त्यांतील महत्त्वाचा भाग. हे पिंडज्ञान आणि तत्त्वज्ञान दोन्हीं जरी एक जिज्ञासू म्हणून कोणी जाणून घेतलें असलें तरी केवळ तेवढ्याने समाधान प्राप्त होत नाही.
Calendar Day 27
शरीराची रचना जाणून घेतली, शरीराचे व्यापार कसे चालतात तें कळले आणि आरोग्यशास्त्राचा अभ्यास केला तरी केवळ तेवढ्याने मनुष्य निरोगी, स्वस्थ होण्याची शक्यता नाहीं. परीक्षेपुरतें आरोग्यशास्त्राचे नियम पाठ करून आरोग्यसंपन्नता येत नाहीं. तीच स्थिति तत्त्वज्ञानाची. नित्य काय आणि अनित्य काय, टिकणारे कोणतें-मरणारें कोणतें, आपल्या हिताच्या दृष्टीने काय घ्यावे, काय टाकावे, हें कळावे, त्या दृष्टीने उत्पन्न होणाऱ्या इच्छा, आकांक्षा, वासना या पारखून घेता याव्यात म्हणून तत्त्वज्ञान उपयोगी पडते.
Calendar Day 28
शास्त्रपूत तत्त्वज्ञानाधारें वर्तन घडले नाहीं तर मग नुसते शाब्दिक तत्त्वज्ञान हें समाधान देऊं शकणार नाहीं. आरोग्याचे नियम चांगले ज्ञात असलेला वैद्यहि अपथ्य करील तर व्याधीने पीडला जाईलच; तसेच तत्त्वज्ञानाचा विद्वान् जर निरिच्छ, संयमी, सदाचरणी नसेल तर तोहि शोकमोहग्रस्त होऊन दुःखाने तळमळणारच!
Calendar Day 29
कांहीं लोक चित्ताच्या समाधानासाठी नृत्य, गायन, वादनादि वा त्यांच्या उपलक्षणेने काव्य, कथा नाटकादि ललितकलांचा आश्रय घेतात. या कलांच्यामुळें कांहीं मनोरंजन होईल पण तेवढेच होईल. हे तात्पुरते बरें वाटणे म्हणजे कांहीं खरें समाधान नव्हे. या निरनिराळ्या कलांमध्ये चतुर असलेले ख्यातनाम कलावंतहि परस्परांविषयीच्या द्वेषमत्सरांनी भरलेले असतात आणि वैयक्तिक जीवनांत कामक्रोधांनीं व तज्जन्य नानाप्रकारच्या व्यसनांनी किडलेले राहतात. पुवाळलेल्या गंभीर व्रणावर केवळ बाहेरची मलमपट्टी जशी उपयोगी पडत नाहीं, तसेंच मनःस्वास्थ्याच्या प्रकरणी या ललितकलांचे होतें.
Calendar Day 30
तत्त्वज्ञानाच्या आधारावर शास्त्रानें मनुष्याच्या चित्तशुद्धीसाठी योगमार्गादि साधनें सांगितली आहेत. योगाचा अर्थ आहे, चित्तवृत्ति-निरोध. वासना नियंत्रित करून चित्तशुद्धी होण्यासाठी यज्ञयागाचा उपयोग होतो.
Calendar Day 31
आपण ज्याला शास्त्र-शास्त्र असें म्हणतो तो प्रामाणिकांच्या दीर्घकालीन अनुभवांचा संग्रह असतो. म्हणून आपले वाटणे हें शास्त्राच्या कसोटीला उतरणारे नसेल तर ते अयोग्य आहे, त्यासंबंधीचा विचार पुन्हा नव्याने केला पाहिजे, एवढी तरी जाणीव मनुष्यास व्हावयास हवी.
